सांगली : उसाच्या ट्रॉलीला धडकून अपघातात रामापूरचे सरपंच ठार
देवराष्ट्रे; पुढारी वृत्तसेवा : उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात रामापूर (ता. कडेगाव) येथील सरपंच शंकर नामदेव माळी (वय 51) यांचा मृत्यू झाला. रामापूरपासून काही अंतरावर मंगळवारी रात्री ही घटना घडली.
सरपंच माळी हे रामापूरहून एका कार्यक्रमानिमित्त बलवडी फाटा (ता. खानापूर) कडे जुना सातारा मार्गावरून दुचाकीवरून चालले होते. काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावरच उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला माळी यांच्या दुचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये त्यांना जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी विटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.