

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर आटपाडी विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आम्ही ताकदीने लढणार आहोत. काँग्रेसचा तरुण तडफदार चेहरा तयार असून योग्य वेळी तो जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते विठ्ठल साळुंखे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी अचानकपणे पक्षाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर यांच्या घरी भेट दिली. तेव्हापासून या मतदार संघात शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधानसभेची चाचणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार हा राष्ट्रवादी पवार गटाचा असून थेट सुशांत देवकर यांना विधानसभेची तयारी करण्यास सांगितले आहे. इथपर्यंतच्या चर्चा आणि अफवांना अक्षरशः ऊत आला आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप आठ ते दहा महिने अवधी आहे.
काँग्रेसचे नेते विठ्ठलराव साळुंखे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. खानापूर हा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसचा आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून दोन अपवाद सोडले तर येथील जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे. आजपर्यंतचे सर्व आमदार काँग्रेसच्या मुशीतून तयार झाले आहेत. तालुक्यातील अनेक कामे डॉ. पतंगराव कदम यांच्या सहकार्यातून उभी राहिली आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात तालुक्यातील अनेक कामी झालीत, त्यामुळे येथील जनतेच्या हृदयात काँग्रेस आहे. लवकरच काँग्रेस कार्यकारणी जाहीर होईल, ती जनतेतून निवडली जाणार असून यात अठरा पगड जातीचा चेहरा असेल. त्यामुळे काहीही झाले तर काँग्रेस ही जागा पुऱ्या ताकदीने लढणार आहे. असेही ते म्हणाले.