सांगली : पूल पाडायची घाई… रस्त्याचा पत्ता नाही
सांगली; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेरुळ रुंदीकरणासाठी चिंतामणनगरचा रेल्वे पूल पाडला खरा, पण हा पूल पाडण्याअगोदर प्रचंड वाहतुकीची जी सोय करायला हवी होती, ती केलीच नाही. परिणामी अगोदरच खराब असलेल्या पंचशीलनगरच्या रस्त्यावरून ही अमाप गर्दी घुसविण्यात आली. आता तर या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
पूल पाडल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून ज्या जुन्या बुधगाव रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली, तो किमान या गर्दीसाठी योग्य आणि पुरेसा आहे का, हे पाहण्याची तसदीही यंत्रणेने घेतली नाही. याचा प्रचंड मनस्ताप हजारो वाहतूकदारांना रोज भोगावा लागतो आहे. पंचशीलनगरचे रेल्वेगेट दिवसातून किमान पंचवीस वेळा तरी पडते आणि मग इथे तुंबलेल्या गर्दीचा संताप वाढतो. त्याहीपेक्षा संतापजनक गोष्ट आहे ती या रस्त्याच्या दुरवस्थेची. पंचशीलनगरच्या चौकापासून ते रेल्वेगेटपर्यंतच्या या रस्त्यावर पूल पाडल्यापासून वाहतुकीचा प्रचंड ताण पडला आहे. राज्यमार्गाची वाहतूक या रस्त्यावरून वळविताना अगोदर हा रस्ता तरी व्यवस्थित करायला हवा होता. पण, तो केला गेला नाही आणि आज हा रस्ता जीवघेणा बनला आहे.
या रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले आहेत. त्यातूनच गर्दी जाते – येते. अनेकदा या खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघातही झाले आहेत. अगोदरच रस्ता अरुंद आणि त्यात खड्डे, पण ते मुजविण्याचीही तसदी यंत्रणेने घेतली नाही. पंचशीलनगरच्या चौकातून रेल्वे गेटकडे येताना घन:शामनगरकडे जाणार्या रस्त्याच्या तोंडालाच डिव्हायडर म्हणून भले दांडगे सिमेंटचे पोल आणि पत्र्याचे बॅरिकेट टाकण्यात आले खरे; पण ते रस्त्याच्या मधोमधच पडल्याने अपघाताचीच शक्यता जादा आहे. इथेच कोेपर्यावर महापालिकेने कचर्याचा कंटेनर ठेवला आहे. त्याला वळसा घालून पोल चुकवून येताना अनेकदा गाड्यांचे अपघात झाले आहेत. पाऊस पडला तर इथे भयंकर दलदल पसरते, ती वेगळीच.
घन:शामनगरमधून शॉर्टकटने मोठी वाहतूक थेट रेल्वेगेटजवळ येऊन थडकते. हा शॉर्टकटही बंद करायची गरज आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी गेटच्या दोन्ही बाजूला म्हणजे पंचशीलनगरच्या चौकापासून ते समाजकल्याण कार्यालयापर्यंत रस्त्यावर डिव्हायडर बसवावेत, अशी मागणी होत आहे.