

जत : पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी . सरकारने ५० दिवसांची दिलेली मुदत संपलेली आहे. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे व प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांना आज (दि.२१) देण्यात आले.
यावेळी लोकमता पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरराव वगरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक बन्नेनवर, भाऊसाहेब दुधाळ, सागर शिनगारे, युवा नेते रमेश देवर्षी, दिलीप बिरादार, नागनाथ मोटे, बाळू पांढरे, सरपंच संगीता लेंगरे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज डोंगर दऱ्यात राहून, भटकंती करुन उपजीविका करत आहेत. आजही हा समाज विकासापासून वंचित आहे. राज्य घटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले आहे. मात्र, गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली आहे. यासाठी धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री बिरोबा देवस्थान, आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ), श्री महालिंगराया देवस्थान, हुलजंती (ता. मंगळवेढा), श्री बिरोबा देवस्थान, हुन्नूर (ता. मंगळवेढा), श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), श्री वाशी अवघडखान देवस्थान, वाशी या देवस्थानाच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा