देशासाठी धरणग्रस्तांचा मोठा त्याग : जयंत पाटील | पुढारी

देशासाठी धरणग्रस्तांचा मोठा त्याग : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  धरणग्रस्तांनी देशाच्या विकासासाठी केलेला त्याग मोठा आहे. मात्र भावनाशून्य अधिकार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धरणग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न मार्गी लावले असून शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील धरणग्रस्तांचे सारे प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण आघाडी शासनकाळात राज्याचे पुनर्वसन खाते आपल्याकडे मागितले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

आ. पाटील यांनी पुढाकार घेत धरणग्रस्तांचा 40 वर्षांचा प्रलंबित निर्वाह भत्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल वाळवा व मिरज तालुक्यातील धरणग्रस्तांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन आ. पाटील यांचा सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी धरणग्रस्तांचे नेते किसन मलप, धावजी अनुसे, शंकर सावंत, नामदेव नांगरे, चंद्रकांत सावंत प्रमुख उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, निर्वाह भत्त्यासारखा एखादा प्रश्न सुटला तर बढाया मारण्याची गरज नाही. कारण तो तुमचा हक्क आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना सूचना करून जिल्ह्यातील धरणग्रस्त वसाहतीत कॅम्प घेऊन बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत. पतंगराव कदम राज्याचे पुनर्वसन मंत्री असताना अधिकार्‍यांना सूचना करायचे. मात्र अधिकारी अंगावर घ्यायला तयार नसायचे. आपले राज्यात पुन्हा सरकार येऊ शकते. आपण यावेळी नक्की पुनर्वसन खाते घेऊन केवळ आपले नव्हे, तर राज्यातील सगळ्या धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू.

धावजी अनुसे म्हणाले, आ. जयंत पाटील यांनी आपणास आतापर्यंत 100 कोटींचा निधी मिळवून देत आपले अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आपले उर्वरित प्रश्नही तेच सोडवू शकतात. यामध्ये कोणी राजकारण आणू नये. यावेळी बाबुराव मोरे, चंदर सावंत, तुकाराम पाटील, विजय चव्हाण, प्रकाश नांगरे, आकाश पाटील, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button