

सांगली जिल्ह्यातील अंजनीसारख्या खेडेगावातून आपले साम्राज्य निर्माण केलेल्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील अर्थात आबांनी आपली ओळख गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्माण केली. सहा वेळा आमदार राहिलेल्या आबांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून ओळख होती. पण नियतीला हे मान्य नसल्याने आबांचे कॅन्सरने १६ फेब्रुवारी २०१५ ला निधन झाले. (R. R. Patil)
दरम्यान, आबांनी आपल्या उपचारासाठी ८ नोव्हेंबर २०१४ ला आपले घर सोडले आणि ते परत कधी आलेच नाहीत. अशी भावनिक पोस्ट त्यांची मुलगी स्मिता पाटील यांनी फेसबुकवर लिहिली आहे. स्मिता पाटील यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आज 8 नोव्हेंबर … बरोबर 7 वर्ष झाली. माझ्या वडिलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले.
काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.
3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.
6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधून सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे बघून जात असतं. पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधून वेळ काढून मी व माझी बहीण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूममध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते.
आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व पप्पांच्या डोळ्यात का पाणी उभारले असावे? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पांनी आम्हाला शेवटचे खुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते.
स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणख किती सत्कार करणार …?
मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?