अलमट्टी भरल्याने महापुराचा धोका वाढला : आंदोलन अंकुश | पुढारी

अलमट्टी भरल्याने महापुराचा धोका वाढला : आंदोलन अंकुश

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  अलमट्टीसह कृष्णा खोर्‍यातील धरणांच्या परिचलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व धरणातून विसर्ग होतो की नाही यावर लक्ष दिले पाहिजे. तसा विसर्ग होत नसेल तर त्यासाठी पावले उचलली पाहिजेत, अन्यथा ऑगस्टअखेर पर्यंत पुन्हा एकदा महापुराचा दणका बसण्याचा धोका आहे, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका वाढतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. गेली आठ दिवस पाऊस पूर्ण थांबला आहे. पण नृसिंहवाडीमध्ये पाणी अद्याप उतरायला तयार नाही. सध्या अलमट्टी भरत आले आहे. तसेच कोयना, वारणा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि अन्य सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले आहे. टप्प्याटप्प्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी होत जाणार आहे आणि विसर्ग वाढवावा लागणार आहे.

कोयना धरणामध्ये सध्या 79.70 आणि वारणा धरणामध्ये 29.17 टीएमसी पाणी आहे. परंतु पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला तर ही दोन्ही धरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे लवकरच भरतील. मग विसर्ग वाढवावा लागेल. त्याचवेळी अलमट्टी धरणातून विसर्ग कमी आणि पाणी पातळी 519 मीटर असेल तर शंभर टक्के महापुराचा धोका संभवतो. त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोयना आणि वारणेसह कृष्णा खोर्‍यातील धरणांचे परिचलन सांभाळतानाच अलमट्टी धरणातून सातत्याने विसर्ग वाढवण्यासाठी आत्तापासूनच तातडीने हालचाल केली पाहिजे. अलमट्टी धरणात ज्या पद्धतीने पाण्याची आवक होत आहे त्याच पद्धतीने विसर्ग सध्या होत नाही.

जुलै महिन्यामध्ये केवळ दहा-बारा दिवसातच पाऊस वाढला आणि सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. मोसमी पावसाचे नक्षत्र बदलले आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तातडीने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला पाहिजे, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

Back to top button