![file photo](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2F11-4-4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वारणावती, पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळी आठ ते शनिवार सकाळी आठपर्यंत 24 तासांत 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात 7,083 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा हळूहळू वाढू लागला आहे. यंदा पाऊस सुरू झाल्यापासून गेल्या 24 तासांत हा 35 मिलिमीटर सर्वाधिक पाऊस झाला आहे.
शनिवारीही दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासांत सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर वाढल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ओढे, नाले प्रवाही झाले आहेत. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त आहे. भाताची रोप लावण ठिकठिकाणी सुरू झाली आहे.
शनिवारी दुपारी चार वाजता धरणाची पाणी पातळी 599.95 मीटर होती. पाणीसाठा 12.67 टीएमसी होता. त्याची टक्केवारी 36.83 आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 5.79 टीएमसी आहे. त्याची टक्केवारी 21.04 आहे. धरणातील विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी हळूहळू वाढू लागली आहे.