‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोडा प्रकरण : बिहारमधून महत्त्वाचे धागेदारे हाती!
सांगली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील रिलायन्स ज्वेल्स सराफ पेढीच्या दरोड्याप्रकरणी बिहार कनेक्शन उघड झाले आहे. महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांगली पोलिसांचे पथक बिहारमध्ये छापेमारी करीत आहे. नेपाळ सीमेवर देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
रिलायन्स ज्वेल्सवरील दरोड्याचा छडा लावण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यापूर्वी सांगली पोलिसांची स्वतंत्र आठ पथके स्थापन केली आहे. त्यातील एका पथकास बिहारमधील धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. दुसर्या पथकाकडून नेपाळ सीमेवरही पोलिसांचा खडा पहारा दिला जात आहे. तेथील हलचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या पेढीची रेकी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून एक मराठी भाषिक असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याची माहिती ही पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे. हैदराबादमधून ताब्यात घेतलेल्यांकडून देखील महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
साडेसहा कोटींचे सोने
रिलायन्स ज्वेल्समधून सुरुवातीला 14 कोटी 69 हजार 300 रुपयांचे सोने व हिरे चोरीस गेल्याचे सांगण्यात आले होते. परंतु रिलायन्सकडून आता चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत ठरविण्यात आली. एकूण 6 कोटी 44 लाखांचे सोने गेल्याचे सांगण्यात आले.