शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही : जयंत पाटील | पुढारी

शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  भाजप शिंदे गटाला 48 जागा सोडायला तयारी दाखवित आहे. परंतु, निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. भाजप 288 जागा चिन्हावरच लढवेल आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, भाजपला स्थानिक पक्ष, राज्यस्तरावरील पक्ष यांचे अस्तित्व मान्य नाही. हे पक्ष आपली मते खाणार आहेत, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो या शत्रू असो त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करून त्यांच्या मागे जाणारी मते आपल्या मागे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. पाटील पुढे म्हणाले, शिंदे गट राहणार की नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच आणि यदाकदाचित राहिला तर भाजप सर्व्हे करेल आणि जाहीर केलेल्या 48 जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या 5-6 जागा निवडून येणार आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल.

Back to top button