.. तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार : जयंत पाटील
इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या राजकीय हालचालींबाबत जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही वेगळा लागला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. राज्यभर आपण सभांचे आयोजन केले आहे. या सर्व सभा यशस्वी व्हाव्यात यासाठी सर्वच घटक पक्षांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, सत्ता पालट होताना राज्यपाल महोदयांनी कसा हस्तक्षेप केला हे आता पुढे येत आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आता सत्तेत असलेले राज्यकर्ते साम, दाम, दंड, भेद वापरून लोकशाहीला ठेच पोहोचवत आहेत.
ते म्हणाले, येणार्या काळात सुप्रीम कोर्टाचा जर वेगळा निकाल लागला तर कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन विधानसभेच्या निवडणुका लागतील. महाराष्ट्रातील जनता शिंदे – फडणवीस सरकारला मतदानातून विरोध करायला उत्सुक आहेत. नियोजबद्ध निवडणुका लढविल्या तर यश आपलेच आहे.असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.