सांगली : जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याचे लोकार्पण | पुढारी

सांगली : जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याचे लोकार्पण

जत : पुढारी वृत्तसेवा : जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि.१७) रात्री पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजय पाटील, माजी जलसंधारण मंत्री आ. जयंत पाटील, माजी आ. विलासराव जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळा समितीचे पदाधिकारी हजारो शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

जत येथील शिवाजी पेठेतील शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणप्रसंगी गतवर्षी प्रशासन व पुतळा समिती यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर पुतळा समितीच्या वतीने रितसर सर्व विभागाच्या परवानगी घेण्यात आल्या. पुतळा समितीचे अध्यक्ष व माजी आ. विलासराव जगताप यांनी १७ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण करण्याची घोषित केले होते. अखेर लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी जिल्ह्याचे खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. विक्रम सावंत, जत राजघराण्याच्या ज्योत्सनाराजे डफळे, सेनेचे संपर्कप्रमुख योगेश जानकर, रिपाईचे संजय कांबळे, डॉ. रवींद्र आरळी, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत , उमेश सावंत, संतोष मोटे आदी उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या  पुतळा बसवण्यासाठी आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, हे सर्वांना माहितच आहे. लोकार्पण सोहळ्याची माझी जबाबदारी होती ती आता पार पाडली आहे. छत्रपती हे रयतेचे राजे होते. त्यांनी न्यायाला नेहमीच प्राधान्य दिले. त्‍यामुळेच साडेतीनशे वर्षानंतर ही छत्रपतींच्या आज नाव प्रत्येकाच्या ओठात आहे.

यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले की, माझा पहिला मतदारसंघ हा जत आहे. त्यामुळे मी जत तालुक्याला जास्तीत- जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील टेंभू- म्हैसाळ योजना ही सौरऊर्जेवर राबविण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली असून ती जर्मनमधून मंजूर झाली आहे. शासनानेही यासाठी निधीची तरतूद केली आहे.

माजी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, लवादामुळे कृष्णा आणि कोयना या योजनेत पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे वारणा खोऱ्यातून जतसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. ते आताच्या शासनाने ही योजना मंजूर केले आहे. दोन-तीन वर्षात या योजनेमुळे जत तालुका सुजलाम -सुफलाम होणार आहे.

खा. संजय पाटील म्हणाले की, अनेक वर्षापासून छत्रपतींचा पुतळा जत शहरातील छत्रपती शिवाजी पेठेत व्हावा, अशी शिवप्रेमींची इच्छा होती. परंतु, काही अडचणी येत होत्या. या अडचणी गतवर्षी आम्ही दूर केल्या आणि त्यानंतर रितसर परवानगी घेऊन आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील तमाम शिवप्रेमींच्या मनामनात आनंद निर्माण होत आहे.

माजी पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

पालकमंत्री खाडे म्हणाले की, मी ज्यावेळी या जत मतदारसंघाचा आमदार होतो, त्यावेळी  जयंत पाटील यांनी १६ साठवण तलावासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. आता त्यांनीच सहा टीएमसी पाण्याची तरतूद केल्याने या योजना मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button