सांगली : जनतेत गोंधळ; नेतेही संभ्रमित

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

विटा; विजय लाळे :  राज्याच्या राजकारणाच्या सारीपाटावर भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदी प्रमुख पक्ष आहेत. एकमेकांबरोबर व विरोधात उभे असल्याने खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कमालीची राजकीय सरमिसळ झाली आहे. निवडणुकीनंतर जिंकलेला गट नेमका कोणाचा असेल, याबाबत जनतेबरोबरच नेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु हे सगळेच पक्ष आणि त्यातील छोटे गट यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने खानापूर तालुक्यात अत्यंत गोंधळाची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.  सामाजिक, आर्थिक, धार्मिक विचारधारा, पक्षीय धोरणे, नेत्यांच्या भूमिका या सगळ्या गोष्टींना फाटा देत भावकी, गावकीचे वाद याबरोबरच स्वतः च्या राजकीय अस्तित्वासाठी गावागावात सरमिसळ आघाड्या निर्माण झाल्या आहेत. नेमके कोण कोणासोबत हेच कळेनासे झाले आहे.

खानापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावात स्थानिक पातळीवरील वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे. वैयक्तीक मतभेद, गावकी, भावकीचे वाद इत्यादीपासून ते हात ऊसने पैसे माघारी न देणे, एकमेकांकडे रागाने बघणे, जागेचे वाद, शेतात जनावरे सोडणे अशी असंख्य गमतीशीर गोष्टी या निवडणुकीचे मुद्दे होवून बसली आहेत.

गावात असणारे एकाच गटाच्या दोन- दोन आघाड्या बनल्या आहेत. परिणामी एकाच गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत.वाळूज या ठिकाणी एका पॅनेलच्या पोस्टरवर चक्क आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांचे एकत्र फोटो छापले गेले आहेत. रेवणगावात आमदार बाबर आणि राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब मुळीक या दोन गटाने एकत्र येवून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. जोंधळखिंडीत आमदार बाबर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी अण्णा देशमुख यांचे गट एकत्रित लढत आहेत.

आळसंद येथे आमदार बाबर गट आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थक एकत्रित आहेत. भाळवणीत माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि बाबर समर्थक एकत्रित आहेत. बेणापुरात काँग्रेसचे सुहास शिंदे आणि आमदार बाबर समर्थक एकत्र आले आहेत. बलवडी (भा) मध्ये आमदार बाबर आणि आमदार अरुण लाड समर्थक एकत्र आले आहेत. गावागावातील अशा सरमिसळ आघाड्या नेत्यांनासुद्धा संभ्रमित टाकताना दिसत आहेत.

बाबर गटामध्ये स्थानिक पातळीवर फूट

खानापूर तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर तसेच काँग्रेसचे रवी देशमुख आणि सुहास शिंदे यांचे गट आहेत. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये आमदार बाबर गट आणि आमदार पाटील गट पारंपरिक विरोधक म्हणून जनतेसमोर आले आहेत. अनेक ठिकाणी आमदार बाबर गटामध्येच स्थानिक पातळीवर फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. तसेच काही ठिकाणी परस्पराची जिरवायची या नादात विरोधी गटाबरोबर युती करून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news