आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. वाढलेले तापमान आणि संततधार पावसामुळे मृगबहार धरलेल्या डाळिंब बागात तेल्या रोगाबरोबरच पाकळी करपा, कुजव्याने धुमाकूळ घातला आहे.
मागील काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. चार वर्षांत पावसामुळे दुष्काळी भागाला तारणहार ठरलेले डाळिंब पीक धोक्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतात पाणीसाठा झाला आणि जास्त पाणी मुरल्यामुळे मर आणि पिन होल बोर रोगाने हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. बागाच्या बागा शेतकर्यांनी काढून टाकल्या आहेत. आटपाडीच्या पश्चिम भागात बागांचे अल्पप्रमाण आहे तर पूर्वभागात रोगामुळे डाळिंबाचे क्षेत्र घटत चालले आहे.
पिकावर मर आणि पिन होल बोर रोगाच्या तडाख्यातून वाचलेल्या डाळिंबाचा बहार काही शेतकर्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात तर राहिलेल्या शेतकर्यांनी जुलैच्या दरम्यान धरल्या आहेत. जून महिन्यातील बागेत सेटिंग झाले आहे तर त्यानंतर धरलेल्या बागा कळी आणि फळ धरणेच्या अवस्थेत आहेत. पंधरा दिवसांपासून आटपाडी तालुक्यात पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. दिवसातून किमान एकदा तरी दमदार पाऊस हजेरी लावत आहे. ज्यादा पाऊस झाल्यामुळे शेतातून पाणी बाहेर पडून नाले, ओढे यातून वाहू लागले आहे.