सांगली : तीन मुलींसह पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीस अटक | पुढारी

सांगली : तीन मुलींसह पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीस अटक

जत; पुढारी वृत्तसेवा : बिळूर (ता.जत) येथे बेपत्ता असलेल्या तीन मुलीसह मातेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तपासानंतर पतीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून महिलेने मुलींसह आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मयत सुनिता माळी हिचा भाऊ महादेव श्रीशैल माळी (रा.कोहळ्ळी, ता.अथणी) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुली व पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुकाराम चंद्रकांत माळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच वेळी कुटुंबातील चौघींनी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. सुरुवातीस गावात घातपात व संशयास्पद मृत्यू अशी चर्चा सुरू होती. सोमवारी सायंकाळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेश रामघारे यांनी भेट दिली होती. यानंतर तपासास गती मिळाली.

घटनेनंतर मयत सुनिता माळी यांचा भाऊ महादेव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बहीण सुनिता तुकाराम माळी (वय २७) व भाच्या अमृता तुकाराम माळी (वय .१३),अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) यांनी तलावात उडी टाकून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या करण्यास तुकाराम माळी हे जबाबदार आहेत. त्यांनी लग्न झाल्यापासून त्यांच्या पत्नी सुनीता माळी व मुली यांना वारंवार त्रास दिला आहे. सुनीता यांना शारीरिक व मानसिक त्रास वारंवार दिला जात होता. या त्रासाला कंटाळून सुनिता व तिच्या मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करून न्याय मिळण्याची मागणी देखील फिर्यादकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा;

Back to top button