सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील कर्नाळ रस्त्यावरील ऐश्वर्या गार्डनजवळ राहणार्या अजित बाबुराव अंगडगिरी (वय 19) याचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून केला. पद्माळेफाटा ते माधवनगर रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
याप्रकरणी तीन हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. ते सांगलीतील गावभाग परिसरातील असून ते गायब झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना झाली आहेत.
अजित हा एका महाविद्यालयात पदवीच्या दुसर्या वर्गात शिक्षण घेत होता. महाविद्यालयात झालेल्या वादातून त्याचा काटा काढला असण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. अजितच्या वडिलांचे ऐश्वर्या गार्डनजवळ पान दुकान आहे. पदवीचे शिक्षण घेत तो फोटोग्राफी व्यवसाय करीत होता. तसेच वडिलांना हातभार लावण्यासाठी पान दुकानातही बसत होता. त्यांनी काही महिन्यांपूर्वी माधवनगर रेल्वे रुळालगत शेत करायला घेतले आहे.
बुधवारी शेतात खत टाकायचे होते. यासाठी अजितने चार महिलांना खत टाकण्याचे काम दिले होते. तोही आजीसोबत शेतात गेला होता.
सायंकाळी साडेपाच वाजता शेतात खत टाकत असताना अजितच्या ओळखीचे तिघेजण आले. त्यांनी अजितला शेतातून रस्त्यावर बोलावून घेतले. काही वेळ त्याच्याशी वाद घातला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यानंतर एका हल्लेखोराने कंबरेला लावलेले धारदार हत्यार काढून अजितच्या छातीत डाव्या बाजूस वार केला. हा वार एवढा वर्मी होता की, अजित काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
शेतातील महिला व आजीने हा प्रकार पाहिला. हे सर्वजण रस्त्यावर आले. काही वाहनधारकांच्या मदतीने अजितला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पण वैद्यकीय अधिकार्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. खुनाचे वृत्त समजताच सांगली शहर, सांगली ग्रामीण व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांची पथके घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाली होती.
मृत अजितच्या नातेवाईक तसेच मित्रांनीही रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. रात्री उशिरा विच्छेदन तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धारदार हत्याराचा एक वार हृदयापर्यंत वर्मी बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.