सांगली : भाजपामुळे देश अधोगतीकडे; जयंत पाटील यांचा आरोप | पुढारी

सांगली : भाजपामुळे देश अधोगतीकडे; जयंत पाटील यांचा आरोप

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : आज देशात महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने काय केले याचा कोणताही हिशेब नाही. देश अधोगतीकडे जात असल्याची खरी परिस्थिती मान्य करण्यास हे सरकार तयार नाही, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.

दिल्ली येथे राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पाटील बोलत होते. ते म्हणाले, युपीए सरकारच्या काळात देशात सामान्यांच्या, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे देशातील विविध घटकांनी प्रगती केली. आज सामान्य जनतेवर जीएसटी लादला जात आहे. नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे.ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन आपल्याला आहे. पवार यांचे विचार ही आपल्यासाठी फार मोठी वैचारिक ताकद आहे. खा. पवार देशाचे कृषिमंत्री असताना अन्नधान्य आयात करणारा आपला देश निर्यात करणारा झाला असल्याचे पाटील शेवटी म्हणाले.

Back to top button