अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग केला कमी, कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत घट | पुढारी

अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग केला कमी, कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत घट

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा दोन लाख क्यूसेक पर्यंत विसर्ग वाढवण्यात आला होता. पण आता कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होऊन पुराचा धोका टळला आहे. यामुळे आज मंगळवारी अलमट्टीतून होणारा विसर्ग कमी करुन दीड लाख क्यूसेकवर आणण्यात आला आहे. आज धरणातून  १ लाख ५० हजार क्यूसेक विसर्ग सुरू सुरु आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

अलमट्टीची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी इतकी आहे. सध्या धरणात १०३.९१६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण हे ८४.४७ टक्के भरले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कायम होती. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पावसाची जोर ओसरला आहे. त्यामुळे तीव्र पूर परिस्थिती टळली आहे. त्यातच अलमट्टी धरण व्यवस्थापन आणि कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवल्याने संभाव्य बिकट पूरपरिस्थिती टळण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा :  

Back to top button