मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विमानतळाच्या धर्तीवर एस.टी.च्या प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी महामंडळाने पहिल्या टप्प्यात 20 प्रमुख बसस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बोरिवलीत उभारावयाच्या 16 मजली स्थानकाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 20 बसस्थानकांचे बसपोर्टमध्ये रूपांतर होणार असून, त्यात सांगली, कोल्हापूर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगरच्या स्थानकांचा समावेश आहे.
2016 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील 13 बसस्थानकांचे बसपोर्टमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. राज्यभरातील विविध बसस्थानकांच्या जागांचे मूल्यमापन करून आराखडे तयार करणे हे काम एकाच कंपनीला दिल्याने त्यामध्ये प्रचंड दिरंगाई झाली. प्रकल्प रखडल्याने वेळेत निविदा प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून बसपोर्टचा प्रकल्प रखडला. यावरून धडा घेत आता एस.टी. महामंडळाने वेगवेगळ्या कंपन्यांना-कंत्राटदारांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाने आता राज्यभरातील 20 ठिकाणी बसपोर्ट उभे करणे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वास्तुविशारद नेमण्यात येणार असून, पुढे सहा महिन्यांमध्ये याकरिता निविदा प्रक्रिया राबवून वर्षअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा एस.टी. महामंडळाचा विचार आहे.