जयंत पाटील : ‘भाजपकडून देशाला धर्माच्या अफूची गोळी’ | पुढारी

जयंत पाटील : ‘भाजपकडून देशाला धर्माच्या अफूची गोळी’

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कार्ल मार्कस् म्हणायचा धर्म ही अफूची गोळी आहे. भाजपने सध्या देशाला ही अफूची गोळी देऊन मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी काही बुजगावणी उभी केली आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता आज येथे पत्रकार परिषदेत केली.

पाटील म्हणाले, मध्यवर्गीय, गरिबांना महागाईने घेरले आहे. संसार कसा करायचा, हा या लोकांपुढे प्रश्न आहे. अशावेळी धर्म नावाची अफूची गोळी दिली जात आहे. काही काळ माणूस त्या गुंगीत राहिल, मात्र रात्री झोपण्याआधी त्याला उद्याचा दिवस कसा काढायचा, याची चिंता नक्की वाटते आहे. सामान्यांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे भाजपकडून हे राजकीय भोंगे वाजवले जात आहेत.

पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करून भोंगे लावायला हरकत असण्याचे कारण नाही. तो नियम जो कोणी मोडेल, तो कोणत्याही धर्माचा असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. मनसेने या विषयात दंगा करायचा ठरवला असेल तर मात्र राज्याची पोलिस यंत्रणा सक्षम आहे. ते त्यांचा बंदोबस्त करतील.

भाजप नेत्यांच्या संरक्षणाबाबतीत टोला

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांना केंद्राकडून झटपट संरक्षण दिले जात आहे. त्याविषयी जयंत पाटील म्हणाले, मला पोलिस संरक्षण घेण्याची वेळ कधी आली नाही. या लोकांना कदाचित अतिरेक्यांपासून धोका असण्याची शक्यता आहे. त्यांना दाऊदचा फोन आला असू शकतो किंवा त्यांचे कुणाशी काही गंभीर बिनसलेले असू शकते.

फडणवीस बाबरी मशिदीतून पळाले होते का?

देवेंद्र फडणवीस यांनी कधी ते बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते, असे सांगितले नाही. जर ते तेथे गेले होते तर कुठे उभे होते, त्यांना दगड वगैरे लागले का, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता का… की ते तेथून पळून आले होते, याची माहिती त्यांनी मला सहज गप्पा मारता मारता द्यावी. ते खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट आहे. बाबरी पाडून किती वर्षे झाली? त्यावेळी त्यांचे वय किती होते? या सगळ्या गप्पांना अर्थ नाही.

Back to top button