“राजू शेट्टींबद्दल चुकीची विधाने करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका” | पुढारी

"राजू शेट्टींबद्दल चुकीची विधाने करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका"

पलूस, पुढारी वृत्तसेवा : “आमदार अरुण लाड यांनी प्रथम माहिती घेऊन व उघड्या डोळ्यांनी पाहून वक्तव्ये करावी. सांगली ते इरिगेशन फेडरेशनच्या मिटिंगमध्ये बोलताना राजू शेट्टींच्या बद्दल त्यांनी चुकीचे विधान करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी निषेध केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज वसगडे येथे पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. संदीप राजोबा म्हणाले की, “कोल्हापुरमध्ये महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर रस्त्यावर राजू शेट्टी दिवसा शेतकऱ्यांना शेतीसाठी १० तास लाईट मिळावी म्हणून १५ दिवस रात्र ठाण मांडून बसले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील इरिगेशन फेडरेशन व शेतकरी कोणाला भेटून गेले, हे आपणाला माहीत नाही. त्यावेळी तुम्ही कुठे गायब होता”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आंदोलनाची दखल घेऊन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजू शेट्टींना मुंबईला मिटिंगसाठी बोलवलं आणि दिवसा १० तास कशाप्रकारे लाईट देता येईल यासाठी कमिटी नेमली. त्या मिटिंगला आपणसुद्धा होता. त्यावेळी ऊर्जामंत्री आपल्याला काय बोलले हे सुद्धा जनतेला कळू दे. ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर जी.डी बापूंनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकरी प्रश्नावर घालवलं. आपण त्यांचे वारसदार आहात स्वतःच्या स्वार्थासाठी आपण कोणाची भाषा बोलत आहात. इथे राजू शेट्टी दिवसा लाईट मागतात आणि आपण रात्रीची लाईट मागत आहात. हे समजणे इतका शेतकरी खुळा नाही”, असे मत संदीप राजोबा यांनी मांडले.

“तुम्ही सरकारमध्येच आहात. सरकार तुमचेच आहे. मग तुम्ही आंदोलन कोणाच्या विरोधात करणार? हे एकदा जनतेला सांगा. एक रकमी एफआरपी देतो म्हणून धादांत खोटं बोलून शेतकऱ्यांच्या पोरांची आमदारकीसाठी मते गोळा करून आपण आमदार झाला आहात. त्यावेळी तुम्हाला राजू शेट्टी दिसत होते मग आत्ताच कसे दिसत नाही?  शेतकऱ्यांच्या बद्दलचे तुमचे पुतणा-मावशीचे प्रेम सर्व जनतेला माहीत आहे. आमदा साहेब परिस्थितीची माहिती घेऊन बघून बोला व आरोप करा”, असेही संदीप राजोबा म्हणाले.

“जर आपणाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल तर एक मे महिन्यातील ग्रामसभेमध्ये शेतीला दिवसा १० तास वीज आणि पिकांना एक रकमी हमी भाव मिळावा असा ठराव करावा. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून तसेच सांगली-कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहे. त्याची सुरुवात आपण कुंडल  ग्रामपंचायतीपासून स्वर्गीय जी. डी. बापू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करुया”, असेही राजोबा यांनी सांगितले. या बैठकीसाठी पलूस तालुक्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाो शिंदे,  युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, अशोक शिंदे, विजय चौगुले विजय पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Back to top button