जत तालुका हादरला, टोळी युद्धात दोन तरुणांचा खून, एक गंभीर | पुढारी

जत तालुका हादरला, टोळी युद्धात दोन तरुणांचा खून, एक गंभीर

जत; पुढारी वृत्तसेवा : उमदी (ता.जत) येथे दोन टोळी युद्धाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. या भडक्याने दोन तरुणांचा बळी घेतला आहे. दोघा तरुणांना धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती गंभीर बनली आहे. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे. या प्रकरणी संशयित १२ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मदगोंडा नागा बगली (वय २४) व संतोष राजू माळी (वय २३) रा. उमदी अशी मयत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोशल मीडियातील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button