सांगली : भेसळीचा गोरखधंदा : कृषी औषधांचा मिळेना ‘रिझल्ट’ | पुढारी

सांगली : भेसळीचा गोरखधंदा : कृषी औषधांचा मिळेना ‘रिझल्ट’

सांगली : विवेक दाभोळे

ऐन हंगामात जिल्ह्यात शेतकर्‍यांना, उत्पादकांना बनावट आणि भेसळयुक्त कीटकनाशके, संप्रेरके यांचा फटका बसू लागला आहे. भेसळीचा हा ‘गोरखधंदा’ चांगलाच तेजीत आहे. या औषधांच्या वापराने अपेक्षित ‘रिझल्ट’ मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. कोरडवाहू शेतकर्‍यांना सातत्याने बनावट बियाणांचा सामना करावा लागतो. यात बनावट, भेसळयुक्त औषधांची भर पडली आहे. जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी भेसळीच्या कृषी औषधांची धुमधडाक्यात विक्री होत आहे. शेतकर्‍यांना लुटणारा हा ‘गोरखधंदा’ तातडीने रोखण्याची गरज आहे.

जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याकडे वळला आहे. यातून भाजीपाला क्षेत्रात दिवसेंदिवस वाढच होत आहे. जादा उत्पादनासाठी शेतकरी अनेकवेळा परवडत नसतानादेखील महागडी औषधे वापरतो, पण त्याला आता या भेसळयुक्त आणि बनावट कृषी औषधांचा फटका बसत आहे.

बड्या कंपन्या मालामाल

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्याची राज्यभरात भाजीपाला पिकविणारा आघाडीवरील जिल्हा म्हणून ओळख होत आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्यातून ताजा पैसा मिळत असल्याने शेतकरी याकडे वळू लागला आहे. भाजीपिकांची जोमाने वाढ व्हावी, फळधारणा व्हावी, वजन वाढावे यासाठी अनेक शेतकरी आर्थिकदृष्टया परवडत नसतानादेखील महागड्या औषधांची फवारणी करतात, पण त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

एकीकडे उसाला अपेक्षित दर नसताना, जोडव्यवसाय म्हणून भाजी-फळभाज्या पिकांकडे वळू लागलेल्या शेतकर्‍याला या भेसळयुक्त कृषी औषधांमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तक्रार करायचा विचार केला तर बड्या कंपन्या याची काडीचीदेखील दखल घेत नसल्याचे सांगण्यात आले.

संबंधित औषध कंपन्या जबाबदारी झटकत राज्यशासनाचा आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग देखील याची फारशी दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करू लागला आहे. अनेक ठिकाणी बनावट औषधांची विक्री करणार्‍या कंपन्यांविरोधात तक्रार करूनदेखील संबंधित कंपन्यां या तक्रारींची दखल घेत नसल्याचे चित्र आहे.

तीन वर्षांपूर्वी खरीप हंगामात आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही टापूत कापसाच्या बनावट बियाणाचा शेतकर्‍यांना फटका बसला होता. आता बनावट कृषी औषधांचा फटका बहुसंख्य शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादकासमोरील संकटांची मालिका अधिकच गहिरी झाली आहे. मात्र, याकडे यंत्रणा लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.

भेसळयुक्त औषधांचा बंदोबस्त करा

शेतकरी महागड्या कृषी औषधांची जादा उत्पादनासाठी फवारणी करतो. मात्र, बनावट औषधांतून शेतकर्‍यांचा फायदा दूरच त्याचा आर्थिक तोटा होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. बनावट कृषी औषधांतून शेतकरी, भाजीपाला उत्पादकांची फसवणूक करणार्‍या कंपन्यांचा मुलाहिजा न ठेवता शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तरच असे प्रकार थांबू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाठीराख्यांचा पर्दाफाश करा

बाजारपेठेत शेतीमाल दरातील अस्थिरता, उत्पादन खर्च आता सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्यात राहिलेला नाही. अशा काळातदेखील जादा उत्पादनासाठी महागड्या औषधांची शेतकरी फवारणी करतो. मात्र, त्यातून त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक लूट आणि फसवणूक करणार्‍या कंपन्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी. वास्तविक पाहता शेतीसाठीची औषधे आधीच महागडी आहेत. या खर्चाने शेतकरी, द्राक्ष उत्पादक आर्थिक आघाडीवर मेटाकुटीस आला आहे. आता बनावट औषधांची भर पडते आहे.

या बनावटगिरीने शेतकर्‍यांचा पैसा वाया जात आहे. पिकांची हानीदेखील होत आहे. विविध नैसर्गिक संकटांचा, लॉकडाऊनचा सामना करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. कृषी विभागाने अशा भेसळयुक्त शेती औषधांची विक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करावा. त्याचप्रमाणे अनेक कंपन्या राजकीय पक्षांना मदत करतात त्यांचाही पर्दाफाश करण्याची गरज आहे.
– अशोक माने, नेते, शेतकरी संघटना

कृषी विक्रेत्यांच्या झाडाझडतीची गरज

जिल्ह्यात भाजीलागवडीचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, यातील अनेक शेतकर्‍यांना बनावट औषधांचा फटका बसू लागला आहे. अनेक शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करतात, पण त्यांना अपेक्षित ‘रिझल्ट’ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. द्राक्ष उत्पादकांची तर यातून लूट होऊ लागली आहे. या बनावटगिरीचा फटका बसलेले शेतकरी याबाबत संबंधित कंपन्यांकडे तक्रार करण्यासाठी गेले तर त्यांची साधी दखल देखील घेतली जात नसल्याचे सांगण्यात येते. या सार्‍या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वेळोवेळी कृषी औषधे विक्रेत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेण्याची गरज आहे. तशी मागणीही होत आहे.

Back to top button