नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक प्रेम संबंधांतून झालेल्या वादातून एका प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची घटना नेवाळीत दिड महिन्यांपूर्वी घडली होती. हत्या केल्यानंतर आरोपीने नेवाळी परिसरातून पलायन केल्याने त्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र हिललाईन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून औरंगाबादमधून आरोपीच्या तब्बल दिड महिन्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.
नेवाळी पोलीस चौकीच्या मागे असलेल्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत वैभव आणि त्याची प्रेयसी वास्तव्याला होते. प्रेयसी ही लग्नाचा तगादा लावत असल्याने वैभवने तिचा गळा चिरून तिची हत्या केली होती. वैभव हा कल्याण ग्रामीण मधील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीत काम करत होता. मात्र सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने त्याने गळा चिरून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वैभवने प्रेयसीची हत्या करून औरंगाबाद गाठले होते. त्याला पडकण्याचे मोठे आव्हान हे पोलीस यंत्रणांसमोर उभे ठाकले होते. मात्र हिललाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ, पोलीस शिपाई घाडगे, पोलीस शिपाई बाबू जाधव, पोलीस शिपाई बडे यांच्या पथकाला एका खाबऱ्याकडून माहिती मिळाल्या नंतर औरंगाबादकडे धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी त्याला चिखलढाणा औरंगाबाद येथे अटक केली आहे.
गेल्या दिड महिन्यांपासून वैभवच्या शोधात असलेल्या पोलिसांना तपासात आरोपाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. यशस्वी कारवाई केल्या बद्दल हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.