

उरण: पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारती अथवा घरे कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी उरण नगरपरिषदेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेतर्फे शहरात करण्यात आलेल्या विशेष मान्सूनपूर्व सर्वेक्षणात तब्बल 54 इमारती धोकादायक आणि चार इमारती या अतिधोकादायक असून त्या कधीही कोसळण्याची भिती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या सर्व धोकादायक इमारतींना उरण नगरपालिकेने तात्काळ कायदेशीर नोटिसा बजावण्याचे काम पूर्ण केले असल्याची माहिती नगरपालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
पावसाळ्यात जुन्या आणि जिर्ण झालेल्या इमारती पडून दुर्घटना घडण्याचे सत्र दरवर्षी पाहायला मिळते. अशी कोणतीही अप्रिय घटना उरण शहरात घडू नये याकरिता उरण नगरपालिकेने यावर्षी अधिक गांभीर्याने धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व्हेच्या अहवालामध्ये उरण शहरात 54 इमारती धोकादायक असल्याचे पुढे आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या 54 इमारतींपैकी 4 इमारती अतिधोकादायक आहेत. यामध्ये दोन शासकीय इमारती असून त्या देखील अति धोकादायक स्थितीत आहेत. संभाव्य अपघातांचे गांभीर्य ओळखून उरण नगरपरिषदेने संबंधीत खाजगी इमारत व घरमालकांना नोटिसा दिल्या असून, त्यांना इमारती तात्काळ रिकाम्या करण्यास सांगितले आहे.
यातील काही अतिधोकादायक इमारती आधीच पाडण्यात आल्या आहेत तर काही इमारती सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्णपणे रिकाम्या (खाली) करण्यात आल्या आहेत.
धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. म्हणूनच सर्व संबंधित रहिवाशांना कायदेशीर नोटिसा दिल्या असून त्यांना इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
- निखिल दोरे, मुख्य अभियंता, उरण नगरपरिषद