

अलिबाग: राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी नियुक्त असलेल्या ज्या शिक्षकांचा पाच वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे, अशा शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार 28 जून रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. रायगड जिल्ह्यात नऊ केंद्रांवर एकूण पाच हजार 468 शिक्षक परीक्षा देणार आहेत.
टीईटी परीक्षेच्या तयारीसंदर्भात तसेच सनियंत्रण समिती गठीत करण्यासंदर्भात बुधवारी (3 जून) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. रायगड जिल्ह्यातील 9 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून एकूण 5 हजार 468 शिक्षक ही परीक्षा देणार आहेत.
राज्यातील शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी 28 जून रोजी ही परीक्षा होणार आहे. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशन जावळे, सदस्य पोलीस आयुक्त कार्यालयामधील अभिजीत अभंग, रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महारूद्र नाळे, शिक्षणाधिकारी (योजना) आशा गरूड व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितूले हे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील 9 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून एकूण पाच हजार 468 शिक्षक ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर एकसाठी एक हजार दहा विद्यार्थी, पेपर दोनसाठी एक हजार 915 शिक्षक तर दोन्ही पेपरसाठी दोन हजार 543 शिक्षक प्रविष्ठ आहेत.
सर्वच परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भातही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी समिती सदस्यांना सूचना केल्या. बैठकीसाठी उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, संतोष शेडगे, प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा कोषागारापासून ते केंद्रस्थळी परीक्षेचे साहित्य पोहोचेपर्यंत व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे. वर्गखोल्या, प्रवेशद्वार, केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. उमेदवारांच्या तपासणीकरीता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, फ्रिस्किंग सुविधा आदीबाबत माहिती सदस्य सचिव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सर्व समिती सदस्यांना दिली.
गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता
जिल्हा कोषागारापासून ते केंद्रस्थळी परीक्षेचे साहित्य पोहोचेपर्यंत
व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे.
वर्गखोल्या, प्रवेशद्वार, केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणार.
उमेदवारांच्या तपासणीकरीता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, फ्रिस्किंग सुविधा.
परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त.
परिरक्षक व केंद्रसंचालकांची नियुक्ती असणार आहे.