

नेवाळी : कल्याण श्री मलंगगड रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काकाचा ढाबा ते द्वारली, भाल गावापर्यंत जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे चुकवून रस्ता शोधताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास खड्ड्यात तीन चाकी टेम्पो अडकल्याचे प्रकार समोर आला आहे. अडकलेल्या टेम्पोला चालकासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धक्का देताना दिसून आले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांची खड्ड्यांच्या जाचातून मुक्तता होणार कधी? असा प्रश्न पडला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कल्याण मलंगगड अत्यंत वर्दळीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गणेशोत्सव आधी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. गणेशोत्सवाची सांगता होत असताना आता नवरात्र उत्सव जवळ आला आहे. मात्र खड्ड्यांचे साम्राज्य कल्याण डोंबिवलीत जैसे थे! असल्याचे चित्र कायम आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या 27 गावांमधील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी नागरिकांकडून सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. मात्र कल्याण डोंबिवलीकरांच्या नशिबात खड्डेमय रस्ते असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र त्या निधीच्या कामाला सुरुवात होईल तेव्हा होईल मात्र त्याआधी खड्डेमुक्त प्रवास आमचा होऊद्या ! अशी मागणी वाहनचालकांची आहे. सोमवारी खड्ड्यात अडकलेल्या टेम्पो नंतर वाहतूक दारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र खड्ड्यांच्या समस्यांमुळे नागरिकांचे सुरु असलेले हाल लोकप्रतिनिधींच्या देखील निदर्शनास येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.