

माणगाव: महागाईच्या झळांनी आधीच होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वीजबिलाच्या वाढत्या आकड्यांनी अक्षरशः हादरवून सोडले आहे. घरातील वीज वापर पूर्वीइतकाच असतानाही हजारो रुपयांचे वाढीव बिल हातात पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणकडून “स्मार्ट मीटर अधिक अचूक आहेत” असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांना या बदलाचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. माणगाव, रायगड, ग्रामीण भाग तसेच राज्यातील विविध शहरांतून वाढीव वीजबिलाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी बिल आकारले जात होते. स्मार्ट मीटरमुळे आता अचूक नोंद होत असल्याने बिल वाढल्याचे दिसत आहे. मात्र ग्राहकांना हा युक्तिवाद मान्य नाही. कारण अनेकांच्या मते, जर जुनी यंत्रणा चुकीची होती तर त्याची जबाबदारी ग्राहकांवर का टाकली जात आहे ? “मीटर बदलला आणि बिल वाढले” हा अनुभव इतक्या मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नागरिकांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
वीजबिल शून्यावर आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सोलर प्रणाली बसविणाऱ्या ग्राहकांनाही आता धक्का बसू लागला आहे. ‘नेट मीटरिंग’ प्रणालीत बदल, स्थिर आकार आणि इतर शुल्क वाढल्यामुळे सौर ऊर्जा वापरूनही अपेक्षित बचत होत नसल्याची तक्रार समोर आली आहे.
पूर्वी “सोलर बसवा आणि वीजबिलातून मुक्त व्हा” असा विश्वास नागरिकांना देण्यात आला होता. मात्र आता अनेकांना निश्चित शुल्क, कर आणि अतिरिक्त आकारणीमुळे पुन्हा वाढीव बिल भरावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
वीजबिलातील ‘लपलेले’ आकार ग्राहकांच्या डोकेदुखीचे कारण - सामान्य ग्राहकांना फक्त वापरलेल्या विजेचे पैसे भरावे लागतात, अशी धारणा असते. वीजबिलामध्ये विविध प्रकारचे कर, स्थिर आकार, इंधन समायोजन आकार, वहन खर्च आणि इतर शुल्कांचा समावेश असतो. त्यामुळे कमी वापर असूनही बिलाचा आकडा मोठा दिसतो.
गॅस, पेट्रोल, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांच्या वाढत्या खर्चामुळे सामान्य माणूस आधीच त्रस्त आहे. त्यात आता वाढीव वीजबिलामुळे घरगुती बजेट कोसळत असल्याचे चित्र आहे. गरीब, मध्यमवर्गीय आणि सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.
स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहेत.
इलेक्ट्रिकल कंत्राटदार संघटनांनी काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर ग्राहकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ग्राहकांना पुरेशी माहिती न देता आणि तांत्रिक बाबी समजावून न सांगता मीटर बदलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ग्राहकांचे म्हणणे की, स्मार्ट मीटरमुळे प्रत्येक क्षणाचा वापर नोंदवला जातो. त्यामुळे विजेचा वापर बारकाईने मोजला जात असला, तरीआर्थिक ताण सर्वसामान्यांवर वाढत चालला आहे.
ग्राहकांचा थेट सवाल
स्मार्ट मीटर बसवल्यानंतरच बिल वाढ का ?अतिरिक्त शुल्कांचा भार सामान्य ग्राहकांनीच का सहन करावा ?सोलर बसवूनही अपेक्षित बचत का होत नाही ?स्मार्ट मीटरची स्वतंत्र तांत्रिक तपासणी होणार का ?