

खाडीपट्टा : गेली कित्येक दिवसांपासून सर्वत्र पडत असलेल्या दाट धुक्यामुळे परिसरात धुक्याची चादर पसरल्याने वाटाही धुक्यात हरवल्या आहेत, तर धुके इतके दाट आहे की, त्याचा जनजीवनावरही चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे. काही प्रमाणात खोकला, सर्दीचे रुग्ण आढळून येत असून सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तसेच कोणी घरच्या घरी उपचार घेत आहेत.
यावर्षी दिवाळी सणामध्ये थंडीचा अजिबात लवलेश जाणवला नाही, परंतु उशीरा पर्यंत थांबलेल्या परतीच्या पावसामूळे गेल्या आता गेली 15 दिवसांमध्ये अधूनमधून मोठया प्रमाणात थंडी जाणवत आहे. गेली चार, पाच दिवसापांसून एकाकी थंडीने जोर धरला व बोचऱ्या थंडी बरोबर दाट धुकेही पडण्यास प्रारंभ झाल्याने जनजीवनावर त्याचा चांगलाच परिणाम होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
दाट धुके आणि बोचरी थंडी यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी सकाळी व सायंकाळी शेकोट्या पेटू लागले आहेत. स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, घोंगड्या व ब्लँकेट या उबदार कपड्यांनाही बाजारामध्ये मागणी वाढू लागली आहे. रस्त्याने प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडल्यावर समोरचे काहीही दिसत नसल्याने वाहन चालविताना मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे. सकाळी सात वाजता सूर्य नारायणाचे होणारे दर्शन नऊ वाजले तरी होत नसल्याने धुक्याची तीव्रता लक्षात येत आहे.
दाट धुक्याच्या जोडीला जाणवणारी बोचरी थंडी यामुळे वयोवृध्दांना दिवसभर उबदार कपडे घालूनच वावरावे लागत आहे. वाढत जाणारी थंडी व पडत असलेले दाट धुके याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. तर लहान बालके, वयोवृद्ध मंडळी, आजारी असणाऱ्यांना मात्र या वातावरणाचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे.
खाडीपट्टयातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना पडणाऱ्या धुक्याशी सामना करून प्रवास करावा लागत आहे, त्याचा फटका अचानक समोरुन येणारे वाहन धुक्यामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यात या मार्गावरून दोनपदरी रस्त्याचे काम काहीअंशी मार्गी लागायले आले असल्याने सुसाट झालेल्या महामार्गावरुन सुसाट धावणाऱ्या वाहनांना धोकादायक वाटू लागले आहे. धुक्याबरोबरच थंडीचा सामना करीत वाटावरील वळणांना मागे टाकत प्रवास करणाऱ्या तरुणांना मात्र गुलाबी थंडीच्या आनंदाने चांगलीच हुडहुडी भरत आहे.
भात मळणी जोरात
हुडीहुडी भरणाऱ्या थंडीमध्येही भात मळणीची कामे शेतकरी राजा जोरदार करत आहे. पहाटे पहाटे शेतीच्या कामांना सुरुवात होत असून सकाळ होण्यापूर्वीच नियोजित मळणीची कामे पूर्ण होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.