

रोहा: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे रोहा-अष्टमी दरम्यानचा मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे रोहा-अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग रहदारीसाठी धोकादायक ठरला आहे. यामुळे रोह्यावरून मुंबई, पुणे, अलिबाग, नागोठणे आणि पालीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, आधीच दरड कोसळल्याने नागोठणे मार्ग बंद होता, त्यातच आता पुलावरून पाणी आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. रोहा पोलीस आणि नगरपरिषदेचे कर्मचारी पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे. अष्टमी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तालुक्यात पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.