

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर मागील चार दिवसांपासून कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार कायम आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. बुधवारी दिवसभरात रायगड जिल्ह्यात १०५.२ मि.मी.च्या सरासरीने पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. नद्या नाले पुन्हा एकदा दुथडीभरून प्रवाही झाले होते. पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पूरवठा खंडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे आणि सखल भागात पाणी शिरणे यासारख्या घटना घडल्या.
पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली. कुंभलवणे फाटा येथे मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने, काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक यंत्रणांनी तातडीने यंत्रणा पाठवून मार्गावर आलेला दगड मातीचा ढिगारा बाजूला केला यानंतर रात्रीच्या सुमारास हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.
मुंबई गोवा महामार्गावर माणगावमधील ढालघर फाटा येथे पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. तसेच महामार्ग लगतच्या दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यावसायिक देखील त्रस्त आहेत. याशिवाय मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पुलासाठी करण्यात आलेला भराव खचल्याची घटना घडली. तसेच रस्त्याला तडे गेल्याचेही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडून खचलेल्या रस्त्यावर खडी आणि माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात सरासरी १०५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तळा तालुक्यात सर्वाधिक १७०.२ मिमी पाऊस झाला असून त्यापाठोपाठ मुरुड १५७.२ मिमी, रोहा १५३.५ मिमी, श्रीवर्धन १५४.२ मिमी, म्हसळा १२३.८ मिमी, महाड ११२.६ मिमी, अलिबाग १०९.९ मिमी, माणगाव १०४.७ मिमी, पोलादपूर १०२.३ मिमी, उरण ९२.२ मिमी, पेण ८८.६ मिमी, पनवेल ८५ मिमी, सुधागड ८२.१ मिमी, खालापूर ७१.३ मिमी आणि कर्जत ४७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.