

महादेव सरसंबे
रोहे: नळ पाणीपुरवठा योजना तोट्यात असूनही नगरपरिषद योजना चालवत आहे. परंतु नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, पुढील पाच वर्ष पाणीपट्टी वाढविणार नाही. अशी माहिती नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती महेश कोलाटकर, मयुर दिवेकर, निता हजारे, रवी चाळके, नगरसेविका पुर्वा मोहीते, अजित मोरे, प्रशांत कडु, फराह पानसरे आदीसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पत्रकारांना विस्तृतपणे माहिती देताना वनश्री शेडगे यांनी नगरपरिषदेने पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला होता त्याचे ही स्पष्टीकरण दिले आहे. परंतु रोहेकरांना पुन्हा एखदा पाणीपट्टी विषयी माहिती देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
पाणी खर्च ३,०२, ७५, ००० रु एवढा आहे तर उत्पन्न १, ३६, ४९, ६७६ एवढा आहे. आज ही योजना तोट्यात असले तरी नगरपरिषद ही योजना चालवित आहे.सध्या ही योजना तोट्यात असतानाही चालवली जात आहे. एखादी योजना न नफा न तोटा चालविणे आवश्यक.
पण नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने ही योजना तोट्यात नगरपरिषद चालवत आहे. तोटा कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२६ ला नळपट्टी वाढ झाल्यानंतर १५ टक्के नागरीकांनी भरली सुध्दा आहे.
पण आम्ही शुद्ध पाणी नागरीकांना देण्यास कटीबद्ध आहोत. खा.सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून रोहा शहरात अनेक योजना राबविण्यात येत आहे असे यावेळी सांगितले.
सभापती मयुर दिवेकर यांनी रोहा शहरात चांगले पाणी पुरवठा होत आहे. पाण्यापासून नागरीकांना कधीही वंचित ठेवणारा नाही. चांगला एखादा नवीन प्रस्ताव तयार झाला तर नळ पाणी पट्टी वाढी संदर्भात सकारात्मक विचार करणार आहोत,असे सुचित केले.
नळ पाणीपट्टी फार मोठी दरवाढ नाही, परंतु मोठी दरवाढ आहे अशी भासवण्याचा विरोधकाचा प्रयत्न आहे. विरोधकांनी उपोषण करण्याचा घाट सोडावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे.
- मयुर दिवेकर, सभापती, रोहा नगरपालिका