

रेवदंडा: रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात मांडला येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अनिस तांडेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मुरुड परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथे राहणारे 65 वर्षीय अयुब हमीद खान यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खान हे आर.टी. दायकॉन डिझाईन अँड बिल्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. या कंपनीशी संबंधित असून, संबंधित कंपनीकडून मांडला परिसरात नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीनुसार, मांडला येथील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेण्यासाठी आरोपीकडून वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला पुलाच्या बांधकामात अडथळा आणणार नाही, या मोबदल्यात 2 लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच दरम्यान आरोपीकडून, ‘पैसे दिले नाहीत तर हातपाय तोडून टाकीन कंपनीची वाट लावीन,’ अशी धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पुढेही मागणी थेट 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे खंडणी, धमकी आणि इतर संबंधित कलमान्वये अनिस तांडेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वेळा रोख रक्कम दिल्याचा दावा
तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये मुरुड तालुक्यातील एका हॉटेलमध्ये आरोपीला 25 हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. त्यानंतर 11 एप्रिल 2026 रोजी पुन्हा 25 हजार रुपये देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच दरम्यान आरोपीकडून, ‘पैसे दिले नाहीत तर हातपाय तोडून टाकीन कंपनीची वाट लावीन,’ अशी धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पुढेही मागणी थेट 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे खंडणी, धमकी आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संबंधित आरोपींची भूमिका, जमीन व्यवहाराचा तपशील आणि मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला का, याचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.