

रायगड: प्लास्टिक कॅरी बॅगमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आणि चौल-रेवदंडा परिसरात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी एक अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शून्य कचरा अभियान चौल-रेवदंडा अंतर्गत रेवदंडा येथील मुख्य मासे बाजारात मासे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एका विशेष पिशवीची संकल्पना अमलात आणली जात आहे. निसर्ग पर्यावरण आणि कोकणमित्र संस्थेचे शैलेश राईलकर यांनी या मोहिमेचे आयोजन केले आहे.
मासे खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा (कॅरी बॅग) वापर केला जातो, जो आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरतो. याला उत्तम पर्याय म्हणून थेट छत्रीच्या कापडापासून या खास पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पिशव्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पिशव्या वापरल्यानंतर पुन्हा धुवून वारंवार वापरता येतात, ज्यामुळे बाजारातील कचरा शून्य होण्यास मोठी मदत होणार आहे.
या एका दर्जेदार पिशवीची मूळ किंमत 30 रुपये आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांना ही किंमत परवडणारी व्हावी आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबावा, यासाठी संस्थेने एक अनोखी देणगी योजना आणली आहे. या 30 रुपयांपैकी 20 रुपये जर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी देणगीच्या माध्यमातून प्रायोजित केले, तर ही पिशवी थेट मासे खरेदी करणाऱ्या ग्राहकाला अवघ्या 10 रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शून्य कचरा चळवळीला गती देण्यासाठी समाजातील दानशूर आणि पर्यावरणस्नेही नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केवळ 100 रुपयांची देणगी देऊन तुम्ही 5 पिशव्या प्रायोजित करू शकता, जेणेकरून 5 गरीब किंवा गरजू ग्राहकांना प्लास्टिकऐवजी ही कापडी पिशवी अत्यंत स्वस्त दरात मिळू शकेल.
या अभियानात सहभागी होण्यासाठी किंवा देणगी देण्यासाठी नागरिकांनी निसर्ग पर्यावरण आणि कोकणमित्र, चौल, अलिबाग येथील शैलेश राईलकर यांच्याशी 8010371773 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.