

महेंद्र माने
नागोठणे : येथील अंबा नदीने रविववार 05 जुलै रोजी दुपारी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असून पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. पुरामुळे शहरात मुख्य ठिकाणी येणारे तिन्ही रस्ते बंद झाल्याने तसेच एसटी स्थानकात पुराचे पाणी भरल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली आहे. नदी किनारील लहान मोठ्या दुकानदारांची धावपळ होऊन ताळांबळ उडाली आहे.
गेले काही दिवस सतत पडणारा पावसाबरोबरच शनिवारी दिवस रात्र शहरासह डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवार 5 जुलै रोजी अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी एस.टी.स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ, मरिआई मंदिर समोरील परिसर, कोळी वाडा, मोहल्ला मटण मार्केट, हॉटेल लॅकव्हयू व सरकारी विश्राम गृहाचा परीसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे एस.टी. स्थानका शेजारील व शिवाजीचौकातील छोटे छोटे टपरीमधील व इतर दुकानदारांनी आपल्या दुकांनातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. तसेच नागोठणे शहरात येणारे तिन्ही ठिकाणचे मुख्य रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत.
एस.टी.स्थानकात पाणी असल्याने एसटी वाहतूकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरत्या स्वरूपास बस थांबा देण्यात आला. एसटी बसने कामानिमित्त प्रवास करणारे प्रवाशी स्थानकात तसेच महामार्गाकडे जाणार्या रस्त्यावर पाणी असल्याने महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी मंदिर, बाळासाहेब ठाकरे नगर मार्गे पावसात जावे लागल्याने प्रवाशांचे हाल होत असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी निश्चित वाढणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे. पुरामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहा.पो.नि. रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला.