

कोलाड : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील आंबेवाडी वरसगांव बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम सरू असुन ते किती निस्कृष्ठ दर्जाचे आहे ते पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन तीन दिवस पडत असलेल्या तुफान पावसामुळे या उड्डाण पुलावरून चक्क जोरदार धबधबा सुरु झाला आहे. या धबधब्यात उड्डाण पुलावरून खडी मोठया प्रमाणात वाहून बायपास रस्त्यावर आली असुन या रस्त्यावर आलेल्या खडीमुळे एक महिला स्कुटीवरून घसरून खाली पडली. परंतु सुदैवाने समोरील असणारे गणपतीवाले प्रदीप एकबोटे व गॅरेज वाले प्रशांत हे मदतीला धावून आल्यामुळे ती महिला थोडक्यात बचावली.
दरम्यान तुफान पडत असलेल्या पावसामुळे उड्डाण पुलावरून आलेल्या पाण्यामुळे वरसगांव मच्छी मार्केट जवळ बायपास रस्त्यावर पाणीच पाणी झाले असुन पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. ठेकेदाराच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार पूर्णपणे ठेकेदार असेल अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील चौपदरी करणाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु आहे. लोकनेत्यांकडून सांगण्यात येते ही काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु खरे पाहता आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुल, बायपास रस्ता, रस्त्याच्या साईड पट्ट्या, गटाराचे काम, उड्डाण पुलावरील पथदिवे, यांचे काम अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. कोणतेही काम पूर्ण झाले नाही. यामुळे या बाजारपेठेतील अवस्था 'एक ना धड,भाराभर चिंध्या, अशी परिस्थिती असुन यामुळे शासनाच्या तिजोरीतुन कोट्यावधी रुपये खर्च करून काम पूर्ण काय होईना? याला जबादार कोण संबंधित ठेकेदार की ठेकेदारावर नसलेला प्रशासनाचा वचक यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.