

रायगड : खवळलेल्या समुद्रात न जाण्याच्या सूचना वारंवार देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा अतिउत्साहीपणा जिवावर बेतण्याच्या हा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. याचेच प्रत्यंतर शनिवारी (दि.1) झालेल्या दुर्घटनेतून दिसून आले. या दुर्घटनेमुळे अलिबागसह रायगड जिल्हयातील पर्यटन स्थळांची नाहक बदनामी होत आहे. भरतीच्या ओहोटीच्या वेळा पाहन स्थानिकांकडून माहिती घेऊनच समुद्रात उतरण्याचे धाडस पर्यटकांनी करावे असा आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, मुरुडमधील काशिद, मुरुड, किनारे श्रीवर्धनमधील समुद्र पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत. विस्तिर्ण स्वच्छ किनारे यामुळे दिवसेंदिवस राज्यभरातील पर्यटक या समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी येत आहेत. गेल्या काही वर्षात समुद्र किनारी पर्यटकांची वाढतच आहे. खाजगी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्थांच्या सहली येथे सातत्याने येताना दिसतात.
मात्र या सहलींमध्ये तरुणवर्गच अधिक असतो. त्यामुळे येथे आल्यावर तरुण पर्यटकांचा अतिउत्साह दिसून येतो. समुद्रात उतरताना समुद्राच्या प्रवाह, भरती ओहोटीचा अंदाज न घेणे, मद्य प्राशन यामुळे पर्यटकांबाचत मोठ्या दुर्घटना घडत आहेत. काही वर्षापूर्वी मुरुड समुद्र किनारी पुण्यातील महाविद्यालयीतील १३ मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. यामुळे सर्वच समुद्र किनाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत.
पावसाळ्यात पर्यटकांना समुद्रात उतरण्यास बंदी घालणे, सूचना फलकांद्वारे धोक्यांची माहिती देणे, संकटकाळात मदत, जीवरक्षकांची तैनाती, पोलीसांचे गस्त आदी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक बुडण्याच्या घटना घडत आहेत.
शनिवारी (१ नोव्हेंबर) मुंबई सानपाडा येथून चार तरुण अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास ते जिल्हा न्यायालयाच्या इमारती मागील समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने भरतीच्या प्रवाहात वाहून गेले. रविवारी सायंकाळपर्यंत सापडून आलेले नव्हते.
वर्षभरात जिल्ह्यात शंभर जणांचा बुडून मृत्यू
रायगडमधील सुंदर समुद्र किनारे, धबधबे, धरणे, नद्या पर्यटकांना आकर्षित करत असतात. अनेकजण समुद्र किनारे, धबधबे, धरण, तलावांवर मौजमजा करतात. यावेळी अतिउत्साहात मोठा धोका पत्करतात. त्यामुळे अती उत्साहामुळे बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र, हरिहरेश्वर, पाताळगंगा नदी, पाली भुतावली, मोरबे, कलोते, भूतवली धरण, आंबा नदी, खोपोली, माथेरानमधील शॉर्लेट, उल्हास, पेज, कुंडलिका, मुरुड समुद्र किनारा, काशीद बीच, चिकणी बीच, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारे, महाड तालुक्यात मांडले धबधबा, रायगड किल्ल्यावरील गंगासागर तलाव आदी ठिकाणी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
रेवदंड्यात खलाशाचा बुडून मृत्यू
रेवदंडा : येथील समुद्र खाडीत मच्छीमारी करता गेलेला परप्रांतिय खलाशी होडीतून पडून बेपत्ता झाला होता. ३० ऑक्टोबर रोजी रात्री प्रदिप भांजीनाखवा यांच्या जय भवानी बोटीवर सहकारी खलाशीसह पार्टी करून रात्री ९.३० चे सुमारास मच्छीमारी करण्यासाठी खाडी मार्गे समुद्रात गेलेला, उत्तर प्रदेशमधील रहिवाशी असलेला खलाशी प्रदिप कमजोरी हा बोटीत जेवण करण्याचे वेळी दिसून आला नाही. त्याचा परिसरात शोध घेतला, परंतु मिळून आला नाही, याबाबत मिसिंगची तक्रार रेवदंडा पोलिस ठाणे येथे नोंदविली होती. या मिसिंग बाबत शोध सुरू असताना, रेवदंडा आंग्रेनगर समुद्र किनारी शोध घेत असताना १ नोव्हेंबर रोजी कमजोरी हा समुद्राचा पाण्यात वाहून आलेला बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.