Raigad News : मावळत्या वर्षात अनुभवला महापूर अन् अवकाळीचा तडाखा
खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
खाडीपट्टा सरत्या 2025 या वर्षात विविध समस्यांसह विविध घडामोडींनी गाजला आहे. सरत्या वर्षाचा मागोवा घेतला असता राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात घडले, तर खैरे धरणाच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार पाईप लिकेजची समस्या त्याचबरोबर गढूळ पाण्याचा पुरवठा आणि रासायनिक सांडपाण्याच्या विषारी दुर्गधींनी नागरिक पुरते हैराण झाले, खाडीपट्टयाला कोणी वालीच नसल्याचे नागरिकांकडून ऐकायला मिळाले.
वर्षाच्या सुरुवातीला याचदरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग मिळाला, मात्र कामामध्ये पारदर्शकता नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये वृक्षांची तोड करण्यात आली.
वर्षाच्या सुरुवातीपासून सततच्या वनव्यामुळे वनसंपदा अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. हवामानाच्या सततच्या बदलामुळे आंबा हंगामाला मोठा धोका पोहचला होता. तर याठिकाणी बीएसएनएलचा मोठा खेळखंडोबा पाहायला मिळाला, तेथील मनोरे केवळ नावालाच उभारले असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध पिकांची लागवड करुन दुबार शेतीचा आधार घेतला त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला जोडधंदा मिळाला.
ऐन उन्हाळयात खाडीपट्टा तहानलेला होता, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडून झालेल्या नागरिकांच्या गैरसाईने नागरिक पुरते हैराण झाले होते.वळवाच्या आणि अवकाळी पावसामुळे महाड-म्हाप्रळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला होता. तेलंगे येथे गुरांचा गोठा जळून मोठे नुकसान झाले, तर ऐन मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लग्न सराईवर विघ्न कोसळले.
वारंवार वीज खंडीत होण्याच्या घटनेमुळे नागरिक पुरते वैतागले होते. यादरम्यान राजिप मुख्य कार्यकारी आधिकारी नेहा भोसले यांनी खैरे धरणाला भेट देऊन समस्या सोडवणार असे अश्वासन दिले, मात्र आजही खैरे धरणासंदर्भातील समस्या सुटलेल्या नाहीत. खाडीपट्टयातील महामार्गावरील पुलांना संरक्षण कठडा नसल्याचा मुद्दा प्रखरतेने गाजला. पावसाच्या सुरुवातीलाच खाडीपट्टयात 20 जुन रोजी पुरस्थिती निर्माण झाली.
याचदरम्यान खाडीपट्टयातील 12 गावांना दरडींचा धोका निर्माण झाला होता. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने 26 जुलै रोजी सापे आदीवासीवाडी येथील पडवीची भिंत कोसळली, तर नडगाव येथे घराची भींत कोसळली. पुन्हा 16 जुलै रोजी पुरपस्थिती निर्माण झाली. 2 जुलै रोजी वादलीवारे, पावसामुळे तेलंगे येथे शेळयांचा गोठा कोसळला.
स्वच्छ पाण्याची अजूनही प्रतीक्षाच
जलशुध्दीकरण केंद्राचे कॅबिनेट मंत्री ना.भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यांत आले, यावेळी ना.भरत गोगावले यांनी खाडीपट्टा वासियांची पाणीपट्टी माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, मात्र शुध्द व स्वच्छ पाण्याची प्रतिक्षा आजही खाडीपट्टा वासियांची संपलेली नाही आणि पाणीपट्टी देखील माफ झालेली नाही. खैरे प्रादेशिक योजनेची मुदत संपली असताना देखील अजून या योजनेचे काम अपूरे आहे.

