

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. एका बाजूला गुलाबी थंडी वाढत असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. शेकाप वगळता कुठल्याच राजकीय पक्षाने जिल्ह्यात आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे मात्र अंतिम निर्णयावर कुणीही पोहोचलेले दिसत नाही.
दिवाळी संपल्यानंतर जिल्हयात तापमानाचा पारा खाली उतरायला सुरूवात झाली आहे. सध्या काही ठिकाणी किमान तापमान 19 अंशांपेक्षा कमी झाले आहे. सकाळी आणि संध्याकाळी हवेत चांगलाच गारठा निर्माण होत आहे. पहाटेपासूनच दाट धुके पहायला मिळते. हवेतील गारठा वाढला असून रायगडकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. सध्या शेकोटया कुठेही पेटलेल्या दिसत नसल्या तरी नगरपालिका निवडणूकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण पेटायला सुरूवात झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान मुरूड, महाड, रोहा, श्रीवर्धन आणि खोपोली या दहा नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरूवात झाली. रायगड जिल्हयात महायुती विरूदध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे जुळू शकतात. त्यावरूनदेखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
महायुती आघाडयांची बोलणी सुरू आहेत. यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या जात आहेत. महायुतीमधील घटक पक्ष एकत्र निवडणूका लढवण्याची भाषा एकीकडे करत असतानाच तिघांची तोंडे तीन दिशेला अशी स्थिती आहे. एकमेकांवर दुगाण्या झाडत आहेत. यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहेत. शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर तुटून पडत आहेत. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
मित्र पक्षांमधील सुरू असलेल्या वादात भाजप मात्र दुरून पहात मजा घेत आहे. आपल्याच मित्रपक्षांवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सामान्य मतदारांचे यात चांगलेच मनोरंजन होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर आला आहे. मात्र त्यांचेही एकमत होत नसल्याने उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत आहे.
इच्छुकांची मनधरणी करताना पक्षश्रेष्ठींची कसरत
महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर आला आहे. मात्र त्यांचेही एकमत होत नसल्याने उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत आहे. आगामी जिल्हा परीषद निवडणूकांचा विचार करून मित्र पक्षांची मर्जी सांभाळताना आपल्याच कार्यकर्त्यांची मनधरणी अशी तारेवरची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागते आहे.
उमेदवारी आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे तिकीट कापण्यासाठी समर्थंकांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना साकडे घातले जात आहे. नगरसेवकपद मिळवणे प्रतिष्ठेची बाब झाल्याने प्रत्येक जण आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.