

अलिबाग : एकवेळ विधानसभा, लोकसभा निवडणुका परवडल्या, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की सर्वच नेत्यांना कसरत करावी लागतेय. तसाचअनुभव सध्या रायगडातील सर्वच पक्षांची नेतेमंडळी घेताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकांसाठीउमेदवार निवडताना दमछाक होताना दिसत आहे. शिवायउमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांची नाराजीही ओढावूनघेण्याची वेळ नेतेमंडळींवर आलेली आहे.
जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे. यासाठी सोमवारी 10 ते 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या जोरबैठकाही वाढलेल्या आहेत. बदलती राजकीय परिस्थिती, नगराध्यक्षपदासाठी पडलेले आरक्षण, त्यासाठी योग्य क्षमतेचाउमेदवार, तो उमेदवार किती खर्च करु शकेल, पक्षावरील निष्ठा यांचा सारासार विचार नेतेमंडळी करताना दिसत आहेत. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने त्यासाठी योग्य उमेदवार शोधतानाही नेतेमंडळींचा कस लागत आहे. याशिवाय नगरसेवकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने त्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न नेत्यांना पडला आहे. तब्बत पाच वर्षानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने गेली पाच वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची की पक्षात उमेदवारीसाठी आलेल्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची यावरुनही राजकीय पक्षांमध्ये जोरदार घमासाम सुरु झाल्याचे जाणवते.
सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. काही नगरपालिकांमध्ये युतीतील पक्ष एकमेकांविरोधात असल्याचे सांगितले जाते. कर्जतमध्ये तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर ठाकरे गटासोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातअजून तरी म्हणाव्या निर्णायक हालचाली दिसत नाही. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाआघाडी एकसंध राहील की शेवटच्या क्षणी फुटेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात युती विरुद्ध आघाडी आहे. मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्यांमधील घटक पक्षांत अद्याप सुर जुळलेले दिसत नाही. सत्तेत राहिलेले पक्ष मित्र पक्षाला जागा सोडताना हात आखडता घेताना दिसत आहेत. त्यामुळे युती आणि आघाड्यांमधील नेत्यांचे जागा वाटपाचे गुऱ्हाळ रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सुरु होते, ते आगामी तीन-चार दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. आपल्या हक्काच्या जागा न सोडता आपल्या वाट्याला जास्तीत जास्त जागा मिळवून घेण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे. त्यामुळे युती आणि आघाडीतील घटक पक्ष यांच्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रस्सीखेच दिसून येणार आहे. पुढील काळात युती आणि आघाडीतील जागा समाधानकारक होते की घटक पक्ष स्वबळावर मैदानात उतरतात. हेही महत्वाचे ठरणार आहे. अद्याप तरी प्रत्येक पक्ष समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आहेत.