

नाते : ईलयास ढोकले
किल्ले रायगडकडे जाणारा महामार्ग अखेर पूर्णत्वास गेला असला तरी ऐतिहासिक स्थळाला साजेसा नेटकेपणा आणि सौंदर्यीकरण मात्र अद्याप अपूर्णच असल्याची खंत पर्यटक व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा दर्जा लाभलेल्या रायगड किल्ल्याकडे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र महामार्गाच्या दुतर्फा असलेली अस्वच्छता, अनियोजित फलक, विस्कळीत पार्किंग व्यवस्था आणि ऐतिहासिक माहितीफलकांचा अभाव यामुळे पर्यटकांचा अनुभव अपूर्ण राहतो आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांचे मत आहे की, जर परिसराचे नियोजनबद्ध सुशोभीकरण झाले तर पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. ग्रामस्थांनी संबंधित विभागाने एकात्मिक विकास आराखडा जाहीर करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. राज्य शासनाने तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद केंद्रशासनाप्रमाणेच केली आहे. या परिसरातील भौतिक विकासाबरोबर स्थलांतरागकरिता कारणीभूत असलेल्या रोजगाराची संधी निर्माण झाल्यास या परिसराचा सर्वांगाने विकास होऊ शकतो असे मानले जात आहे.
मूलभूत सुविधांची गरज
किल्ले रायगड याला मुंबई व पुणे या दोन्ही बाजूने जोडले गेले असून या दोन्ही मार्गांवर्ती गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपयांच्या जमिनी स्थानिक शेतकऱ्यांकडून बाहेरच्या मान्यवरांनी विकत घेतल्या आहेत. या ठिकाणी आगामी काळात होणारा शासनाच्या मार्फत चा विकास लक्षात घेता या परिसराच्या अंतर्गत येणाऱ्या जनतेसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.
किल्ले रायगडावर बारा महिने येणाऱ्या शिवभक्तांसाठी मुबलक पाणीसाठा साडेतीनशे वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शिवकालीन तलावांच्या माध्यमातून उपलब्ध आहे मात्र पाचाड व परिसरातील नागरिकांची असलेली गेल्या दोन दशकांची पाणीटंचाई शासनाला आज पावे तो दूर करण्यात यश आलेले नाही याकरिता शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करण्यात आल्याचे दिसून येते यामुळेच तीर्थक्षेत्र पर्यटन अंतर्गत किल्ले रायगडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी परिसरातील भीषण असलेली पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होईल याकरिता शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
महामार्ग उभारणी ही स्वागतार्ह बाब असली तरी ऐतिहासिक वारशाला साजेसा नेटकेपणा कधी येणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. पर्यटन विभाग आणि रायगड प्राधिकरण विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने पुढाकार घेतल्यास रायगड परिसराला अपेक्षित ऐतिहासिक वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नियमित स्वच्छतेचा अभाव
महामार्गाचे काँक्रिटीकरण व रुंदीकरण झाले असले तरी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, संरक्षण कठडे व्यवस्थित नसणे आणि दिशादर्शक फलकांची कमतरता जाणवते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला गवत वाढून दृश्य सौंदर्य झाकोळले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणारे आकर्षक कमानीद्वार, प्रकाशयोजना, सुबक दगडी भिंती उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.