

प्रशांत गोपाळे
खोपोली: पाताळगंगा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी घरगुती गॅस सिलेंडरचे उत्पादन करणारी कंपनी रसायनी येथे आहे. कंपनीतील जवळपास 3 हजार सिलेंडर पनवेल तालुक्यातील चवणे येथे सर्व्हिसिंग करण्यासाठी आणले होते.
गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या कंपनीच्या वरच्या डोंगराळ भागातून पाण्याचा प्रवाह आल्याने या कंपनीत दुरुस्तीसाठी ठेवलेले जवळपास एक हजाराहून अधिक सिलेंडर पाताळगंगा नदीच्या प्रवाहात तर नाल्या ओढ्या मध्ये वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
रसायनी भागात चवणे गाव येथे फिल्टर करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे घरगुती वापरण्यात येणारे सिलेंडर आणले होते. बुधवारी सर्वत्र पावसाचा जोर कायम होता. दुपारी पावसाचा जोर अधिकच वाढल्याने वरच्या भागातील पाण्याचा प्रवाह कंपनीच्या आवारात घुसल्याने या पाण्याच्या प्रवाहा बरोबर सिलेंडरही वाहून गेले.
पाताळगंगा नदी,नाले, शेते येथे सिलेंडर पाण्यावर तरंगत असून कंपनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र हे सिलेंडर वापरण्यासाठी योग्य नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो. हे सिलेंडर कोणीही वापरू नये असे आवाहन रसायनी पोलीसांनी नागरिकांना केले आहे.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.परिसरातील नागरिकांनी कोणत्याही ठिकाणी असे सिलेंडर आढळून आल्यास त्यांची स्वतःहून हाताळणी करू नये धोका टाळण्यासाठी ते स्वतःजवळ ठेवू नयेत. तत्काळ सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात द्यावेत.
- अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक रसायनी
एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लॉट मधून 3000 सिलेंडर पाताळगंगा नदीमध्ये वाहून आले आहेत. हे सिलेंडर ज्या नागरिकांना सापडले असतील त्यांनी तत्काळ एचपीसीएल कंपनीकडे अथवा जवळच्या डिलरकडे ,तहसिलदार कार्यालय, खालापूर, पेण तहसिलदार कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांचे कार्यालयास जमा करावेत.
- अभय चव्हाण, तहसीलदार खालापूर