

रमेश कांबळे
अलिबाग: येत्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खोल समुद्रातील मासेमारी बंदीचा कालावधी 1 जूनपासून सुरु झाला आहे. त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. या बंदीमुळे जिल्ह्यातील एकूण 6 हजार 129 मच्छिमार बोटी समुद्रात किनाऱ्यावर विसावल्या आहेत. हा बंदी कालावधी 31 जुलैपर्यंत असून 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी सुरु होईल.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील 4 हजार 293 मोटारचलित आणि यांत्रिक बोटींचा समावेश या बंदीत आहे. याशिवाय 1836 बिगर-मोटारचलित बोटी देखील समुद्रात जाणार नसल्याने संपूर्ण किनारपट्टीवर मासेमारी व्यवहार मंदावणार आहेत.
दरवर्षी मान्सूनपूर्व काळात ही बंदी लागू केली जाते. समुद्रात या काळात वादळी वारे, उंच लाटा आणि खराब हवामान निर्माण होत असल्याने मच्छिमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, उरण आणि पनवेल परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय चालतो. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बंदी काळात मासेमारी पूर्णपणे ठप्प होत असल्याने अनेक मच्छिमार पर्यायी कामांकडे वळतात.
काहीजण बोटींची दुरुस्ती, जाळ्यांची निगा, रंगकाम आणि अन्य देखभाल कामे करतात. मासेमारी बंदीमुळे बाजारात ताज्या मासळीची आवकही कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी मासळीचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोळंबी, सुरमई, बांगडा आणि पापलेट यांसारख्या मासळीची मागणी वाढते.
त्यामुळे नागरिकांना गोठवलेली अथवा इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या मासळीवर अवलंबून राहावे लागू शकते. दरम्यान, मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना बंदी कालावधीत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
बंदी काळात समुद्रात मासेमारी करताना आढळणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. किनारपट्टी भागात गस्त वाढविण्यात येणार असून संबंधित विभागांकडून नियमित पाहणी केली जाणार आहे. मान्सूननंतर पुन्हा मासेमारी हंगाम सुरू होणार असून, त्यासाठी मच्छिमारांकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.