

पेण शहर: सामान्य घरातील मुलाबाळांचा विचार करताना आणि त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहिल्या पाहिजेत, तरच तळागाळातील गोरगरीब विद्यार्थी योग्य शिक्षण घेऊ शकेल असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केले.
मावळा प्रतिष्ठान व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “गजर कीर्तनाचा... सोहळा आनंदाचा“ या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य जाहीर कीर्तन पेण पूर्व विभागातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीतून मनोरंजनातून समाजप्रबोधनही केले. इंदुरीकर यांनी आपल्या ओघवत्या, विनोदी आणि प्रबोधनात्मक शैलीतून अध्यात्म, संस्कार, व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी, कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व तसेच समाजातील विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी जि.प.अध्यक्षा नीलिमा पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, कृऊबा सभापती महादेव मानकर, पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेण व रायगड परिसरातील सुमारे 80 टक्के जनता वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या निघतात. मुलांना केवळ पैसा कमविण्यासाठी नव्हे, तर चांगले संस्कार मिळावेत यासाठी शिक्षण द्यावे, जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संस्कार, समाजात सुसंस्कारित पिढी घडविणे आवश्यकआहे.
- निवृत्ती इंदुरीकर,कीर्तनकार