

अलिबाग : सलग सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्याचे समुद्रकिनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजणार आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन केंद्रांचे आकर्षण केंद्र बनले आहे. शनिवार रविवार आणि प्रजासत्ताक दिन ह्या लागून सुट्टीमुळे पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अलिबाग, मुरूड येथे येणारे काही पर्यटक सुट्टी येथेच एन्जॉय करण्याच्या उद्देशाने आल्याने मोठ्या प्रमाणात रूमचे आरक्षण झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र काही नागरिकांनी वनडे पिकनिकला अधिक पसंती दिल्याचे व्यावसायिकांनी म्हटले आहे.
अलिबाग, मुरूड, नागाव, काशिद, मांडवा, आवास, किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गजबजले आहेत. पर्यटकांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग व मुरूडकडे मांडवामार्गे जलप्रवासाने पर्यटक दाखल झाले आहेत. सागरी सफरीचा आनंद घेत पर्यटक मनसोक्त हुंदडत इथल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असल्याचे चित्र आहे.
समुद्र स्नानाबरोबरच एटिव्ही राईड, जेट स्की, बनाना राईड यासारख्या वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सवर पर्यटकांनी आपला मोर्चा वळविल्याने रांगा लावून सफरीचा आनंद घेतला. उंट सवारी घोडा गाडी यामुळे बच्चेकंपनीही खुश आहे.
तेथील पर्यटन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आरक्षण झाले आहे. तीन दिवसांत 30 ते 35 हजार पर्यटक तेथे दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी पर्यटन व्यावसायिकांनीही जोरदार तयारी केली आहे. अलिबाग येथे समुद्र किनारी चार दिवसीय पर्यटन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील काही पर्यटक हे एसटी बस सेवेचा वापर करून रायगड जिल्ह्यात येत असतात, त्यामुळे एसटी सेवेवर त्याचा मोठा परिणाम होत असतो.
कॉटेज आणि रिसॉर्ट आरक्षणासाठी प्रचंड विचारणा होत आहे. पण रूम शिल्लक नाहीत. आमच्या परिसरातील कॉटेज आणि रिसॉर्ट महिनाभरापासूनच आरक्षित झाली आहेत.
संजय रानवडे, मालक, ब्रिझा नागाव
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ खूपच वाढला आहे. सगळ्या रूम आरक्षित झाल्या आहेत. पर्यटकांची ये-जा सुरू असून सोमवारपर्यंत येथील रिसॉर्ट पूर्णपणे आरक्षित आहे.
ओंकार दळवी, व्यावसायिक, नागाव, अलिबाग