

पोलादपूर : मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे तात्पुरती बंद करण्यात आलेल्या पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) एस.टी. बससेवा पूर्ववत सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी या मार्गाची सुरक्षितता प्रत्यक्ष तपासून एस.टी. सेवा सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश रायगड जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले होते त्यानुसार या घाटमार्गे बससेवा सुरू करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर रोजी महाड आगरतून अक्कलकोट बस यामार्गवर पूर्वत करण्यात येणार आहे.
आंबेनळी घाट हा भौगोलिकदृष्ट्या अतिसंवेदनशील मार्ग मानला जातो. पावसाळ्यात या परिसरात दरड कोसळणे, मोठे दगड रस्त्यावर येणे, झाडे उन्मळून पडणे, मातीचा घसारा होणे तसेच नैसर्गिक नाल्यांमधून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होणे, असे धोके निर्माण होतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून अतिवृष्टीच्या काळात पोलादपूर तहसील प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर आणि आंबेनळी घाट परिसरातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे बंद असलेली एस.टी. सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
पोलादपूर, आंबेनळी घाट आणि महाबळेश्वरला जोडणारा हा मार्ग स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच महाबळेश्वर व प्रतापगड परिसरात येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. एस.टी. सेवा बंद असल्याने या सर्व घटकांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक तसेच वेळेची मोठी गैरसोय होत होती.
या पार्श्वभूमीवर प्रतापगड येथील 'माय भवानी संस्थे'चे अध्यक्ष संतोष हरिभाऊ जाधव यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून आंबेनळी घाट मार्गावरील एस.टी. बससेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली होती.
पोलादपूरचे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कपिल घोरपडे यांनी या मार्गाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला होता. यापूर्वीच रस्ते विकास यंत्रणा आणि एस.टी. प्रशासनाला रस्त्याची दुरुस्ती, दरड प्रतिबंधक उपाययोजना, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक तसेच धोकादायक वळणांवरील सुरक्षा उपायांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
तहसीलदारांच्या अहवालाची दखल घेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखेमार्फत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), मुंबई तसेच एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक, पेण यांना पत्र पाठवण्यात आले होते.
या पत्राद्वारे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी अथवा रेड अलर्टचा कालावधी वगळता सामान्य हवामानात बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी घाटमार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील संभाव्य धोक्यांची तपासणी, सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.