

स्वप्निल पाटील
पेण शहर: पेण तालुक्यात सरासरी साडेदहा हजार हेक्टर भातशेतीपैकी चारशे ते पाचशे हेक्टर म्हणजेच तालुक्यात पन्नास टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती पेण कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली आहे.
नेहमीप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात बरसणारा मान्सून यावर्षी मात्र आठवडा होऊन गेला तरी बरसत नसल्याने बळीराजासह अनेकजण चिंतेमध्ये आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते.
त्यामुळे त्यामुळे बळीराजाचे आभाळाकडे लक्ष लागून राहिले आहे. बळीराजाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते दिवसांत मान्सून दाखल होण्याची चिन्हे असल्याने त्याने अंदाजे सात जूनपासूनच पेरणीला सुरुवात केली आहे.
पेण कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पेणच्या खारेपाट भागात भातशेतीची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने या ठिकाणी बळीराजाच्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
तर इतर ठिकाणी तीस ते चाळीस टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सरासरी साडेदहा हजार हेक्टर भातशेतीपैकी चारशे ते पाचशे हेक्टर म्हणजेच पेण तालुक्यातील बळीराजाच्या पन्नास टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती पेण कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बळीराजाने अंदाजे सात जूनच्या दरम्यान पेरणी केली असली तरी त्या तारखेपासून पुढे दहा ते बारा दिवस तरी भात पेरण्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. शेतकऱ्याने भात पेरणी करताना सुफला खताचा किंवा मिश्र खताचा हलकासा मारा केला असल्याने सद्यस्थितीला तरी शेतकऱ्याच्या पेरणीला कोणत्याही प्रकारचा धोका नसायचे कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले.