

उरण : राजकुमार भगत
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत रायगड जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या पागोटे (किमी ०.१००) ते चौक (किमी २९.३१९) या राष्ट्रीय महामार्ग ३४८ ब (-३४८) या ६-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सुनावणीच्या तारखेत बदल केला असून, आता ही सुनावणी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
यापूर्वी ही जनसुनावणी ३० जाने. होणार होती. मात्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सूचनेनुसार आता नवीन वेळ आणि तारीख निश्चित करण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी दुपारी ०३:०० वाजता ही जनसुनावणी होणार आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल, जि. रायगड येथे ही सुनावणी होणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबाबत नागरिकांनी आपली मते किंवा हरकती मांडण्यासाठी या सुनावणीला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
सध्या जेएनपीए बंदराहन मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर जाण्यासाठी पळस्पे फाटा आणि पनवेलमधील वाहतूक कोंडीमुळे २-३ तास लागतात. या नवीन मार्गामुळे हे अंतर अवघ्या १० ते २० मिनिटांत पार करता येईल. व्यावसायिक वाहनांना घाटातून प्रवास करावा लागू नये म्हणून सह्याद्री पर्वतरांगेत दोन मोठे बोगदे (१९०० मीटर आणि १५७० मीटर) बांधले जातील. या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे दरम्यानचे एकूण अंतर साधारण २० किलोमीटरने कमी होण्यास मदत होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मार्च २०२५ मध्ये अधिकृत मंजुरी दिली आहे. भूसंपादनः या प्रकल्पासाठी सुमारे १७५ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हा प्रकल्प केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये मंजूर केला असून, तो मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्याची लांबी सुमारे २९.२१९ किलोमीटर आहे. हा ६ पदरी प्रवेश-नियंत्रित महामार्ग असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ४,५००.६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवला जाणार आहे. उरणमधील जेएनपीए बंदर, पागोटे गाव (-३४८) येथून सुरू होवून मुंबई-पुणे जुना हायवे (-४८) वरील चौक येथे संपेल. हा मार्ग मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला (-६६) देखील जोडला जाईल.