

पनवेल शहर: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीन अंतर्गत कार्यरत गुन्हे अन्वेषण विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत विविध भागांतून चोरीस गेलेले तब्बल 130 मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
नवी मुंबई परिसरातील पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे तसेच इतर भागांतून गेल्या काही महिन्यांत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढले.
या विशेष मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण-तरुणी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांचे मोबाईल परत करण्यात आले. स्वतःचा हरवलेला किंवा चोरीस गेलेला मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त करत नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांनी मोबाईल चोरी अथवा हरवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रारीसोबत मोबाईलचा क्रमांक उपलब्ध करून दिल्यास शोधकार्य अधिक प्रभावीपणे करता येते.
नवी मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे मोबाईल चोरी करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.पोलिसांनीही या कौतुकाबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत.