

Mumbai Goa highway Kashedi Ghat landslide
पोलादपूर : धनराज गोपाळ
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मंगळवार रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास चोळई व धामणदेवी गावच्या मध्यावर दरड कोसळली. यामुळे मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तहसील व पोलीस प्रशासनामार्फत तळ कोकणात जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
पोलीस प्रशासनाने मुंबई दिशेने जाणारा रस्ता बंद करून चोळई जवळ वाहतूक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर दुहेरी मार्गाने वाहतूक सुरळीत केली. दरड कोसळण्याची घटना समजतात पोलादपूर पोलीस व कशेडी पोलीस यांच्यासह पोलादपूर तहसीलदार कपील घोरपडे, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली.
या घटनेची माहिती समजताच महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनीही घटनास्थळी भेट देऊन महसूल अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस असले तरी गेले आठ दिवस पावसाने दांडी मारून उघडीप दिली असून दरड कोसळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात ठेकेदार व संबंधित महामार्ग प्रशासन बांधकाम विभाग यांनी कशेडी घाटातील भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता डोंगर उभे कापल्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न या विभागातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे.
वारंवार दरडी कोसळण्याच्या आणि जमिनीला भेगा पडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण आणि चौपदरीकरण झाले पाहिजे, ही प्रामुख्याने कोकणातील लोकांची भूमिका होती, मात्र चौपदरीकरण कामात रस्त्याची आधीची वळणे कमी न करता डोंगर माथ्यामध्ये घाटातील डोंगर उभे कापल्याने त्याचा परिणाम कधी ना कधी हे डोंगर सातत्याने खाली कोसळतील हे यापूर्वीच दिसून येत होते.